Saturday, April 28, 2012

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

सचिन 'देव' गाभाऱ्यातून बाहेर ?

भारतीय संघ त्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. १९८९ चा तो काळ असेल. सचिन रमेश तेंडुलकरने कसोटीत पदार्पण केले होते. त्याने फार काही केले नव्हते. अर्थात तशी अपेक्षाही त्या काळी नव्हती. पण अब्दुल कादिरसारख्या बोलरला त्याने फोडले होते. त्याचवेळी गावसकर मागे पडला आणि सचिन हा नवा अवतार पुढे आला. लगेचच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने सेंच्युरी ठोकली आणि मग हा अवतार अधिकच आक्रमक होत गेला. कोणताही बोलर त्याच्या तावडीतून सुटला नाही. कोणताही देश त्याच्या आक्रमणाला थोपवू शकला नाही. शाहीद आफ्रिदी, इंजमामसारखे "प्रतिसचिन' केव्हाच इतिहासजमा झाले. पण सचिन तो सचिनच राहिला.

विक्रमांचे विक्रम करीत त्याची घौडदौड सुरू असताना, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डेमध्ये त्याने २०० धावा केल्या आणि माझ्याप्रमाणेच जगभरातील लाखो चाहत्यांनी सचिनला "देव' मानले. सुनील गावसकर (दुर्देवाने हे स्थान त्याला मिळू शकले नाही. पण तोही त्याकाळात "देव'च होता.) मागे पडून देव्हाऱ्यात सचिनची मूर्ती ठेवली गेली. सचिन नावाचा "देव' सर्वत्र होता. त्याला "देव' मानणाऱ्या अनेकांपैकीच एक विनयकुमार नावाचा चाहता त्याची एकही मॅच चुकवित नव्हता. कोणत्याही सामन्यात हा अंगावर "सचिन तेंडुलकर' लिहून उभा असायचा. २०११ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनने त्याच्या हाती वर्ल्ड कप दिला आणि समस्त चाहत्यांना अभिवादन केले. त्या कृतीने त्याचे देवत्व सिद्ध केले होते. आमचा "देव' कधी चुकत नाही ही आमची भावना त्यानेही जपली होती.

पैशाच्या मागे धावणारा सचिन, एक शतक ठोकता न येणारा सचिन, आता तो म्हातारा झाला आहे, त्याने रिटायर व्हायला हवे, अशा विधानांवर आमचा संताप संताप होत होता. आमचा "देव'आमचे ऐकतो, असेच आम्ही मानत आलो. म्हणूनच त्याने या सर्व "नास्तिकांना' असे फटके द्यावेत, की ते पुन्हा उठता कामा नयेत, अशीच प्रार्थना आम्ही केली. त्याने आमचा "धावा' ऐकला. "देवा'ने असे काही फटकारले की थोबाडे बंद झाली.

त्याला पद्मविभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक किताबांनी त्याला गौरविले गेले. त्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येत होता. हवाई दलात त्याला "ग्रुप कॅप्टन' केले तेव्हा तर आनंद गगनात मावत नव्हता. तो काही लढणार नव्हता, पण तरीही त्याच्या त्या कृतीने अनेकांना हवाई दलात जावेसे वाटले असेल. त्याला कधी एकदा "भारतरत्न' मिळेल याची उत्सुकतेने वाट पाहात राहिलो. पण ते काही होत नव्हते.

या सर्व लाईफमध्ये "देव' कधीच चुकला नव्हता. अगदी "मुंबई सर्वांची आहे' असे (अनेकांना) दुखावणारे वक्तव्य त्याने करूनही आम्ही त्याचे समर्थनच केले. त्याने कोट्यवधी रुपये कमविले. स्टीव्ह वॉ कोलकात्यात समाजसेवा करत असताना आमचा "देव' काहीच का करीत नाही, असा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. ज्यांनी विचारला त्यांची तोंडेही आम्ही बंद केली. राहुल द्रविडसारखा गुणवान खेळाडू निवृत्त होत असताना, त्याच्या गौरवासाठीही हा "देव' का गेला नाही, यावरही आमच्याकडे उत्तर नव्हते. तरीही आम्ही दडपून हाणले. सिद्धीविनायक, बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात म्हणून आम्ही कधी तिथे गेलो नाही. पण शाळा, कॉलेज, नोकरी सारे काही बाजूला ठेवून, प्रसंगी पोलिसांच्या काठ्या झेलत या "देवा'चे दर्शन घेत राहिलो. "देवा'चा अपमान करणाऱ्या कपिललाही आम्ही सोडले नाही. आम्ही अंधश्रद्धाविरोधी आहोत. पण तू सत्यसाईबाबांच्या चरणी गेलास, तरी आम्ही नाराज झालो नाही. उलट तुझ्या श्रद्धेचे गोडवेच गायले.

असा हा आमचा "देव'. कालपर्यंत तो कधीच चुकत नव्हता. पण आज मात्र हा "देव'चुकला असेच वाटले. एक पायरी सोडून खाली आला आणि केवळ खासदारकी मिळावी यासाठी चक्क "10 जनपथ'च्या दाराशी गेला. एरवीही महाराष्ट्र याच पत्त्यावर लोटांगण घालत असताना, आता "देवा'नेही असेच का करावे? हा "देव' तेथे गेल्याने म्हणे राजकारण शुद्ध होणार आहे, असे म्हणणारे म्हणोत पण आम्ही काही तेव्हढे भाबडे नाही. आम्हाला आमचा "देव' या पत्त्यावर नको होता. तरीही तो तेथे गेला. ज्याची कुठेही तपासणी होत नाही त्या "देवा'ला भेटीचा परवानाही आहे ना, हे दारावरच्या सिक्‍यिुरिटीने तपासून पाहिले. मगच त्याची गाडी आत येऊ दिली. हा अपमान आमच्या जिव्हारी लागला. कारण आमचा "देव' चाहत्यांऐवजी पैशाच्या, सन्मानाच्या मागे गेला. सामान्यांचा सत्कार स्वीकारण्याऐवजी अंबानींच्या पार्टीला त्याने महत्त्व दिले. पैसा, सन्मान, किताब यासाठी तो कोणाशीही मैत्री करायला तयार आहे. "देवा'नेच गाभारा सोडला याचेच वाईट वाटते आहे.

एक निस्सीम चाहता

 खासदार तेंडुलकर यांना काही प्रश्न
1) जन्माने परकीय असलेल्या व्यक्तीस देशाचे पंतप्रधानपद देण्यास राजकीय पक्षांचा विरोध आहे. आपले मत काय?
2) लोकपाल विधेयकासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? त्याबद्दल आपली भूमिका काय आहे?
3) कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांना शिक्षा व्हावी असे आपणास वाटते काय?
4) अफजल गुरु याला अद्याप फाशी झालेली नाही. ती तातडीने व्हावी असे आपणास वाटते काय?
5) अयोध्येत राममंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही तोडगा सुचविणार आहात काय? असल्यास तोडगा काय?
6) गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना शिक्षा व्हावी असे आपले मत आहे काय?
7) काश्‍मीरप्रश्नी केंद्र सरकारने कोणती भूमिका घ्यावी असे आपणास वाटते?
8) बेळगावात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारावर आपण आंदोलन करणार काय?
9) मुंबईवर पहिला हक्क कोणाचा? मराठी माणसांचा की परप्रांतियांचा?
10) महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिल्लीत कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? 
(दैनिक सकाळ मधून साभार  )

No comments:

Post a Comment